रावेर- शालिक महाजन / स्पेशल रिपोर्ट | अभिनेता विक्की कौशल याचा बहुचर्चित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालत आहे. या चित्रपटाने मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना पुन्हा चर्चेत आणतांनाच छत्रपती संभाजी महाराजांनी बऱ्हाणपूरवर केलेल्या छापामार युद्ध नितीने केलेला हल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी बऱ्हाणपूरवर केलेला हल्ला छापामार युद्धशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण होते. मराठ्यांनी या हल्ल्यात तब्बल एक कोटींचा खजिना, घोडे आणि शस्त्रास्त्रं हस्तगत करून मुघलांना जोरदार धक्का दिला. इतकेच नव्हे, तर बऱ्हाणपूरला मराठ्यांनी लावलेल्या आगीत सतत तीन दिवस जळत राहिले होते. आता छावा चित्रपटामुळे बऱ्हाणपूर पुन्हा चर्चेत आले आहे. अनेक जण बऱ्हाणपूर मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या पराक्रम वाचण्यासाठी इंटरनेटवर सर्च करत आहेत. नेमके त्याकाळात काय झाल होते. याबाबत वेगवेगळ्या इतिहासकारांचे मत इंटरनेट वरून घेतली काही माहितीच्या आधारावरून आम्ही नेमके त्याकाळी काय झाल असावे हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
बऱ्हाणपूर होती संपन्न राजधानी
मुघल साम्राज्याच्या काळात खानदेशची राजधानी असलेल्या बऱ्हाणपूरमध्ये संपत्तीचा महासाठा होता. येथे कापड, घोडे, शस्त्रास्त्र यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे.जकात आणि जजीया कराद्वारे येथे अफाट संपत्ती गोळा केली जात होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संपूर्ण स्वराज्याची धुरा संभाजी महाराजांनी समर्थपणे सांभाळली. सततच्या लढायांमुळे स्वराज्याच्या तिजोरीवर ताण येत होता. त्यामुळेच मोठ्या संपत्तीच्या शोधात असलेल्या महाराजांना बऱ्हाणपूरच्या प्रचंड खजिन्याची माहिती मिळाली.
छत्रपती संभाजी महाराजांचे अचूक नियोजन
इ.स. 1681 मध्ये संभाजी महाराजांनी बऱ्हाणपूरवर हल्ला करण्याची अत्यंत गोपनीय योजना आखली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, पराक्रमी सेनानी संताजी घोरपडे, निष्ठावान सल्लागार कवी कलश आणि मुत्सद्दी झंझारराव निजाम (मुघलांमध्ये फूट पाडण्यासाठी उपयोगी ठरलेले सरदार) यांच्या सहकार्याने त्यांनी 30,000 शूर मावळ्यांसह बऱ्हाणपूरकडे कूच केले.
महाराजांच्या सेनेने अहिल्यानगर, मलकापूर, मुक्ताईनगर मार्गे प्रचंड वेगाने प्रवास केला. बऱ्हाणपूरच्या अवघ्या 20 कि.मी. अंतरावर पोहोचताच सैन्याचे सहा तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात आले. तापी नदीच्या काठावरून संताजी घोरपडेंनी, दक्षिण बाजूने हंबीरराव मोहितेंनी आणि मुख्य दरवाजावरून आताच्या (फवार चौक)खुद्द संभाजी महाराजांनी हल्ल्याचे नेतृत्व केले.
हल्ला होताच मुघलांची दाणादाण
रात्रीच्या अंधारात मराठ्यांनी वाऱ्याच्या वेगाने बऱ्हाणपूरवर तुटून पडले.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघलांना तयार होण्याची संधीही मिळाली नाही. सुभेदार बहादूरखान कोका गोंधळून गेला. तो खजिना घेऊन गुप्त दरवाज्यातून पळण्याच्या प्रयत्नात होता, पण संताजी घोरपडेंनी त्याचा डाव उधळून लावला.
मराठ्यांच्या आक्रमणाने बऱ्हाणपूर शहर हादरले. हल्ल्यानंतर शहराने सतत तीन दिवस आगीत होरपळून गेले. मराठ्यांनी माघार घेताच मुघल सैन्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांच्या अचूक युद्धनीतीपुढे ते निष्फळ ठरले. स्वराज्याच्या इतिहासात या विजयाने सुवर्णअक्षरांनी स्थान मिळवले आहे.
आजही जिवंत असलेला इतिहास
छावा चित्रपटामुळे बऱ्हाणपूर पुन्हा चर्चेत आले आहे. काल परवा या ऐतिहासिक नगरीला भेट दिल्यावर इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखे वाटले. आजही शहरातील बुरुज, प्रचंड मोठे दरवाजे आणि राजघाटा जवळ वाहणारी तापी नदी त्या काळच्या शौर्याची साक्ष देतात.
बहादूरखानाने खजिना घेऊन तापी नदी (राजघाट ) कडून पळण्याचा प्रयत्न केलेला चोर दरवाजा पाहताना संताजी घोरपडेंनी घातलेल्या तलवारीचे घाव अजूनही तिथे दिसतात असे वाटते. बुऱ्हाणपूरच्या मुख्य दरवाजासमोर (फवारा चौक) उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, बऱ्हाणपूरकडे रोखलेली त्यांची नजर पाहिली की, आजही इतिहास जिवंत असल्याचा भास होतो! छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने उजळलेला बऱ्हाणपूरचा हा ऐतिहासिक अध्याय मराठ्यांच्या शौर्याचा कायमचा साक्षीदार राहीला आहे. आता छावा चित्रपटामुळे या देदीप्यमान इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला आहे.