जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चौगाव येथील पिण्याच्या पाण्याबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. गेल्या वर्षी केलेल्या रासायनिक पाणी नमुन्यांच्या तपासणीत चौगावचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये आणि किडनीशी संबंधित कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रसारमाध्यमे आणि इतर स्त्रोतांकडून चौगाव येथे पाण्यामुळे किडनीचे आजार वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेला सूचना देऊन चौगावला भेट देत माहिती घेण्याचे आदेश दिले होते. आरोग्य यंत्रणेने केलेल्या पाहणीनुसार आणि मार्च २०२५ च्या जैविक पाणी नमुना तपासणी अहवालानुसार, गावातील पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षभरात दूषित पाण्याबाबत कोणताही नकारात्मक अहवाल प्राप्त झालेला नाही.
तरीही, खबरदारीचा उपाय म्हणून १७ एप्रिल रोजी नियमित रासायनिक तपासणीसाठी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, ज्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. सध्या चौगाव येथे किडनी आजारांवर डायलिसिसचे उपचार घेत असलेले तीन रुग्ण आहेत, तर सात ते आठ जणांना मुतखड्याचा त्रास असल्याची माहिती मिळाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील एका वर्षात गावात किडनी आजारामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती प्रशासनाला मिळाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य पथकाने चौगावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. या परिस्थितीत ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारे भयभीत होऊ नये आणि पाण्यामुळे आरोग्यासंदर्भात कोणतीही समस्या जाणवल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ग्रामपंचायतीमार्फत गावात पिण्याच्या पाण्यासाठी मोफत आरओ प्लांट (शुद्धीकरण प्रकल्प) उभारण्यात आला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी शुद्ध आणि फिल्टर केलेले आरओचे पाणी पिण्यासाठी वापरावे, असे नम्र आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.