चाळीसगावात पाइपलाइनच्या कामांमुळे रस्त्यात खड्डे; धुळीचे साम्राज्य

चाळीसगाव दिलीप घोरपडे । शहरात सुरू असणार्‍या पाईपलाईनच्या कामांमुळे रस्त्यांवर अक्षरश: खड्डेच खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा त्रास देखील सहन करावा लागत आहे.

चाळीसगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असून या कामामुळे शहरातील चांगले बनवलेले रस्ते उखडले जात आहेत. यामुळे सर्वत्र खड्डेच खड्डे शहरभर झाले असून शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी शहरातील नागरिकांना श्‍वसनाचे खोकल्याचे आजार होत असून धूळ डोळ्यात जात असल्याने डोळ्यांच्या देखील समस्या निर्माण होत आहेत. यामुळे सर्व नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

वास्तविक या कामात पाईपलाईन बुजल्यानंतर जेथे डांबरीकरण असेल तेथे डांबरीकरण व जेथे काँक्रिटीकरण असेल तेथे काँक्रिटीकरण करून पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र यापैकी काही किरकोळ अपवाद वगळता कुठलेही रस्ते संबंधित ठेकेदाराने पुन्हा योग्य प्रकारे( निवेदा नुसार) दुरुस्त केलेले नाहीत हे सर्वत्र शहरात पाहायला मिळत आहे. या कामावर नियंत्रण असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नपा चे कर्मचारी व अधिकारी हे देखील सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पाईपलाईनच्या कामात प्रचंड मोठा घोळ असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी व्हावी अशा असे निवेदन तक्रार देखील चाळीसगावच्या उपनगराध्यक्ष सौ. आशाबाई रमेश चव्हाण व आरोग्य समिती सभापती सौ. सायली रोशन जाधव यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले असून राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे देखील ही तक्रार नुकतीच करण्यात आली आहे. याची त्वरित चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व चाळीसगाव शहरातील सर्वत्र खराब झालेले रस्ते निवेदनानुसार पुन्हा दुरुस्त करून मिळावेत ही मागणी आता करण्यात येत आहे.

Protected Content