डॉ. नि. तु. पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोना वीर सम्मान

भुसावळ प्रतिनिधी । ख्यातनाम नेत्ररोग तज्ज्ञ तथा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील व डॉ. सौ. रेणुका पाटील यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते कोरोना वीर म्हणून सन्मान करण्यात आला.

तळवेल जन्म गाव असलेले,भुसावळ शहरात वास्तव्यास असणारे आणि वरणगाव मध्ये वासुदेव नेत्रालय आणि ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातुन तालुका परिक्षेत्रात जागतिक महामारी कोरोनाच्या काळात विविध सामाजिक,आरोग्य क्षेत्रात,वैद्यकीय प्रबोधन,जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल डॉ. नि. तु. पाटील आणि डॉ.सौ. रेणुका पाटील यांचा मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते गुलाबपुष्प आणि कोरोना वीर सम्मानपत्र देउन गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य क्षेत्रात खाजगी सेवा करणारे विविध शाखेतील सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडीओ ग्राफर आदी सर्व आरोग्य सेवक यांच्या करोना वीर सम्मान सोहळ्यात समावेश होता.

राजभवनात सर्व शासकीय नियमानुसार हा सत्कार समारोह दि.२७ रोजी पार पडला. राज्यपाल महोदय यांनी सर्व आरोग्य सेवकांची सेवा नसून ही एक तपश्‍चर्याआहे,आपल्या कार्यामुळे करोना संक्रमणामधून बरें होण्याचे प्रमाण ९४टक्के पेक्षा जास्त आहे,आपल्या कार्याची दखल इतिहासात नक्कीच घेतली जाईल. आगामी काळात देखील आपले सेवा कार्य असेच सुरू ठेवा,अश्या शब्दात सर्व करोना वीरांचे कौतुक केले.

दरम्यान, ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. पाटील दाम्पत्याने कोविडच्या आपत्तीत अनेकविध उपक्रम राबविले आहेत. यात कोविडग्रस्तांचे वाढदिवस साजरे करणे, पोलिस बांधव,पोस्ट कर्मचारी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी पूर्ण हात बंद मोजे, गॉगल,प्रभू श्री रामरक्षा वाटप करणे; भुसावळ शहरात स्वच्छता किट वाटप करणे,अन्नदान करणे, सोशल मीडियावर कोरोना पुराण सारखे लेखन व जनजागृतीचा समावेश आहे.

यासोबत ग्रामीण रुग्णालयात करोना सेवा आणि नॉन करोना सेवा देण्यासाठी पाठपुरावा करणे,तपासणी अहवाल लवकर मिळण्याची प्रयत्न करणे,व्यापक स्वरूपात करोना तपासणी शिबिर भरवण्यास ग्रामीण रुग्णालय भुसावळ ला मदत करणे, मृत्युमुखी झालेल्या करोना वीरांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाख विमा साठी आवेदन पत्र भरण्यासाठी मदत करणे,शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करणे, विभागातील सर्व कंत्राटी करोना योद्धा यांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडणे,आदी आदी विविध सामाजिक,आरोग्य आणि जनहितार्थ उपक्रम राबविले आहेत.

डॉ. नि.तु. पाटील आणि सौ. डॉ. रेणुका पाटील यांनी केलेल्या कामाची आता राज्यपालांनी दखल घेतली असून त्यांना सन्मानीत केले आहे. यामुळे समाजातील विविध स्तरामधील जनतेकडून डॉ. परिवाराचे कौतुक होत आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ. नि. तु. पाटील म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने आम्ही केलेल्या कार्याची घेतलेली दखल आणि सत्कार निश्‍चितच अक्षय ऊर्जा आणि सोबत सामाजिक जबाबदारी वाढल्याचे वास्तव जाणीव करून देणारा आहे.आमचा हा पुरस्कार आम्ही करोना रुग्णाची सेवा करण्यार्‍या सर्व शहीद करोना वीरांना समर्पित करत आहोत…!

Protected Content