रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोर घाटात सोमवारी रात्री एका हृदयद्रावक अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा बळी गेला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय ३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रितीक बोडोले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे त्यांची पत्नी मालुबाई (वय २८) आणि दोन मुले रितीक (वय ३) व आठ महिन्यांचा टेंगुराम यांच्यासह भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रात्रीच्या सुमारास बोर घाटात खेरगावकडून भुसावळच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या एका थार गाडीने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पिंटू आणि त्यांचा लहान मुलगा रितीक यांचा घटनास्थळीच अंत झाला.
बोडोले कुटुंब हे भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच भाजपा पक्षाचे रावेर पूर्व तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील आणि बाळा आमोदकर यांनी तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी मालुबाई बोडोले आणि लहान मुलगा टेंगुराम यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलवले. तसेच, त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. या अपघातामुळे संपूर्ण रावेर तालुक्यात शोक पसरला असून, पोलिसांनी संबंधित थार गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.