पाणीपुरवठा योजनांचा धडाका : जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांसाठी तब्बल ९६ कोटी निधींची तरतूद !

जळगाव प्रतिनिधी । जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ६ प्रमुख गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यात जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना, तसेच भुसावळ तालुक्यातील कंडारी आणि साकेगाव या गावांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ९६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून महिना अखेरीस अजून ८ – १० मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाच्या योजनांना मंजुरी देण्याचा धडाका लावल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीचा धडाका सुरू केला आहे.  जिल्ह्यांतील आमदार व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार ४- ५ दिवसांपूर्वी मंत्रालयात गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती. त्यात जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना ना. मंजुरी देण्याचे निर्देशही दिले होते. जिल्ह्यातील लहान मोठ्या गावांचे जास्तीत जास्त प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद व एम.जी.पी.ला दिले आहेत.

६ गावांसाठी ९६ कोटी निधीची तरतूद !

या योजनांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे – ३४ कोटी १५ लक्ष ८७ हजार; मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना १३ कोटी ४५ लक्ष ८९ हजार; चाळीसगाव तालुक्यातील टाकळी – २१ कोटी ३२ लक्ष रूपये ८९ हजार; भुसावळ तालुक्यातील कंडार- १७ कोटी ८९ लक्ष ९ हजार रूपये तर भुसावळ तालुक्यातील साकेगाव-८, ६२ लक्ष १५ हजार या गावांच्या योजनांचा समावेश आहे. यासाठी एकूण ९५ कोटी ४५ लक्ष ८९ हजार रूपयांच्या निधीती तरतूद करण्यात आलेली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अलीकडेच पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द तसेच चोपडा तालुक्यातील धानोरा या मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या आहेत. यातच आता ४ तालुक्यांमधील ६ गावांच्या योजनांना मार्ग मोकळा झाला असून याच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. तर, या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील अजून ८-१० मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एकीकडे लहान आणि मध्यम लोकसंख्येच्या गावांच्या योजनांसाठीचा जिल्ह्यातील कृती आराखड्यानुसार योजनांनाची कामे सुरू झाली आहेत. तर याच्याच जोडीला मोठी गावे असणार्‍या ठिकाणच्या पाणी पुरवठा योजनांना सुध्दा आमचे प्राधान्य राहणार आहे. कोविडच्या काळातही राज्यासह जिल्हाभरात आपण सुरळीतपणे पाणीपुरवठा करू शकलो याचे मला मनस्वी समाधान आहे. जिल्ह्यातील एकही व्यक्ती तहानलेला राहू नये यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

 

Protected Content