नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत मतदानाचे सहा टप्पे पार होताच आम्ही बहुमताचा आकडा पार केला असून सातव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप ३०० जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. राजधानीत आज एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप किती जागा जिंकणार ?, हा प्रश्न माध्यमांकडून मला वारंवार विचारला जातो. त्यावर भाजपने बहुमताचा आकडा सहाव्या टप्प्याअंतीच ओलांडला आहे, असे माझे उत्तर असेल, असे शहा यावेळी म्हणाले. मी प्रचारासाठी देशभरात फिरलोय, यादरम्यान लोकांचा जो प्रतिसाद पहायला मिळाला आहे, तो पाहता भाजपला सातव्या टप्प्यानंतर ३०० पेक्षाही जास्त जागा मिळतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा मला विश्वास असल्याचे शहा यांनी यावेळी म्हटले.
भाजप व नरेंद्र मोदींविरुद्ध विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून २१ मे रोजी या पक्षांच्या प्रमुख नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. याबाबत त्यांना विचारले असता, विरोधी पक्षांचा नेता निवडण्यासाठी बहुदा ही बैठक होत असावी असा खोचक टोला शहा यांनी यावेळी लगावला . विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला आवश्यक संख्याबळ यावेळीही विरोधकांपैकी कुणाकडे नसेल, असा दावाही त्यांनी केला.