रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेत (घरकुल योजना) मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. प्रामाणिक आणि गरजवंत लाभार्थ्यांना डावलून अपात्र लोकांना लाभ देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पंचायत समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संदर्भात आता थेट रावेर पंचायत समितीकडे तक्रार दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या कथित गैरव्यवहारात तत्कालीन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल आणि डॉ. सानिया नाकाडे यांच्या कार्यकाळात अनियमितता झाली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या दरम्यानच्या एका विशिष्ट प्रकरणाचा तपशील आता समोर आला असून, त्यात घरकुल योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी अपात्र व्यक्तींना मिळाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
या गंभीर प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घरकुल लाभार्थ्यांच्या मूळ यादीत फेरबदल करून अपात्र व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली? ज्यांना लाभ मिळाला, त्यांना प्रत्यक्षात घरे मिळाली आहेत की नाही? आणि जर घरे बांधली गेली असतील, तर ती खरोखर लाभार्थ्यांसाठीच आहेत का? यांसारख्या अनेक मुद्द्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
यापूर्वीही रावेर तहसील कार्यालयात आ. चंद्रकांत पाटील आणि आ. अमोल जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी घरकुल योजनेत लाभ मिळवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याच्या गंभीर तक्रारी केल्या होत्या. आता निरूळ गावात याच योजनेत पुन्हा एकदा अनियमितता समोर आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा स्तरावरून एका स्वतंत्र समितीमार्फत कसून चौकशी करावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत. या चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.