भुसावळात बारागाड्यांना गालबोट : दुर्घटनेत एक तरूण जागीच ठार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सातारे गावाची ग्रामदेवता असणार्‍या मरीमातेच्या यात्रोत्सवातील बारागाड्या ओढतांना झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याबाबतचे वृत्त असे की, सातारे गावातील मरिमातेची दरवर्षी यात्रा भरत असते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती. यामुळे यंदा यात्रेत मोठ्या प्रमाणात उत्साह होता. परंपरेनुसार यात्रेच्या दिवशी सूर्य मावळतीला असतांना बारागाड्या ओढण्यात येतात. पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पेट्रोल पंपापासून ते जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरापर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात. एक भगत बारागाड्या ओढत असून त्याच्या सोबत दोन बगले असतात. तर उपस्थित भाविक बारागाड्या ओढत असतात.

दरम्यान, आज परंपरेनुसार सायंकाळी बारागाड्या ओढण्यास प्रारंभ झाला असता काही मिनिटांमध्येच यातील काही गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे झालेल्या अपघातात गिरीश रमेश कोल्हे (42, गवळीवाडा, भुसावळ) हे जागीच ठार झाले तर भाविक छोटू उत्तम इंगळे (33, कोळीवाडा, भुसावळ), धर्मराज देवराम कोळी (63, जुना सातारा, भुसावळ), मुकेश यशवंत पाटील (28, खळवाडी, भुसावळ) व शिक्षक नितीन सदाशीव फेगडे (गणेश कॉलनी, भुसावळ) हे चौघे भाविक जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.

Protected Content