जामनेर (प्रतिनिधी) पावसाळ्यात शहरातील कोणत्याही भागात पाणी साचू नये, यासाठी जामनेर नगरपालिका राबवीत असलेल्या नाले,गटारी साफसफाई अभियानाला वेग आला आहे.
जामनेर शहरात सध्या विकास कामांना जोर आला असून शहरात सर्वत्र नगरपालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटारी, उघड्या गटारी, नाले बांधकाम, अशी विविध कामे प्रगती पथावर आहेत. विकासकामांच्या माध्यमातून संपूर्ण शहराचा चेहरा-मोहरा बदलत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यापूर्वी विविध संभाव्य समस्यांबद्दल स्थानिक प्रशासनाकडून उपाय-योजना आखल्या जात आहेत. पावसाळ्यात जामनेर शहरात कुठेही पाणी साचू नये, यासाठी जामनेर नगरपालिकेने साफसफाई मोहीम राबवित असून शहरातील गटारी,नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील उघड्या गटारी,भूमिगत गटारी तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या केर-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. शहरवासीयांना पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, म्हणून नगरपालिका प्रशासनाच्यावतीने सफाई अभियानाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. घरगुती बाथरुम,शौचालयाचे पाणी भुमीगत गटारीमध्ये सोडण्याचे काम सुरु आहे.