पुणे ( वृत्तसंस्था ) आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही संपूर्ण ४८ जागांवर लढत आहोत, गेल्यावेळी ४२ जागा मिळाल्या होत्या, यावेळी ४३ मिळतील आणि ४३ वी जागा बारामतीची असेल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आज येथे केली.
पुणे येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमूख उपस्थितीत पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांचे संमेलन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीची जागा गेली होती, तेव्हा कमळ चिन्ह नव्हते मात्र आता तसे होणार नाही, कमळच असेल. फक्त बारामतीच नाही तर शिरुर आणि मावळ मधील जागाही भाजप जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत काही जणांची पक्ष टिकवण्याची धडपड आहे. काही जण मुलांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत . भाजपासाठी मात्र ही निवडणूक देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.