बांगलादेश सीमेवर गोळीबार : बीएसएफ एक जवान शहीद ; एक जखमी

मुंबई प्रतिनिधी । भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला तर दुसरा जवान गंभीर जखमी झाला आहे. बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड्स बांगलादेशने (बीजीबी) डांबून ठेवलेल्या भारतीय मच्छिमारांचा सीमेवर शोध सुरू असताना बांगलादेशी सैनिकांनी हा गोळीबार केला. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख व्ही. के. जोहरी यांनी बीजीबीचे प्रमुख मेजर जनरल शफिनुल इस्लाम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्याचे वृत्त आहे.

गुरुवारी भारत-बांगलादेश सीमेवर तीन मच्छिमारांना पद्मा नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोन मच्छिमार परत आले होते. त्यांनीच बीएसएफच्या ककमारीचार पोस्टला बीजीबीने तीन मच्छिमारांना अटक केल्याचे सांगितले. पकडण्यात आलेल्या दोन मच्छिमारांना सोडून देण्यात आलं असून अजूनही एक मच्छिमार बीजीबीच्या ताब्यात असल्याचं या मच्छिमारांनी सांगितलं. तसेच बीएसएफ पोस्ट कमांडरना फ्लॅग मिटींगसाठी बोलावण्यात यावं, असा निरोपही बीजीबीने धाडल्याचं या मच्छिमारांनी सांगितलं. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काकमारिचार सीमा पोस्टवर हा प्रकार सकाळी नऊच्या सुमारास घडला. बीएसएफच्या जवानांचा कमांडर हा मुद्दा सोडवण्यासाठी एका बोटीतून सहा सहकाऱ्यांसह सीमेवर गेला होता. त्यावेळी बीजीबीच्या मोठ्या संख्येने तैनात असणाऱ्या सैनिकांनी तिसऱ्या मच्छीमाराला तर सोडले नाहीच, याउलट भारतीय जवानांना घेरण्याचा प्रयत्न केला.

भारतीय मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी सीमेवर आलेल्या भारतीय जवानांवर बीजीबीने गोळीबार केला. त्यात सीमा सुरक्षा दलाचे विजय भानसिंग हे मुख्य हवालदार जागीच शहीद झाले. तर राजवीर यादव हे हाताला गोळी लागून जखमीं झाले. त्यांना भारतीय हद्दीत यशस्वीपणे आणण्यात आले. त्यांच्या हाताला गोळी लागून जखम झाली आहे. हा गोळीबार करणारा बीजीबीच्या सैनिकाची ओळख पटली असून त्याचे नाव सय्यद आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच विजय भानसिंग यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जवानावर तातडीने उपचार सुरू आहेत.

Protected Content