बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्काराकरीता अर्ज करण्यास 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार2021 करीता ऑनलाईन अर्ज मागविले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली आहे.

पुरस्कारासाठीचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्काराची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहेत. ज्या मुलांनी (वय पाच वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना बाल शक्ति पुरस्कार दिला जातो.

वैयक्तिक पुरस्कार – मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस बालकल्याण पुरस्कार (वैयक्तिक पुरस्कार) दिला जातो. संस्था स्तरावर – बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला बाल कल्याण पुरस्कार (संस्था स्तरावर) दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवरच अवलंबून नसावी, बाल कल्याण क्षेत्रात किमान दहा वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी, असेही श्री. परदेशी यांनी कळविले आहे.

Protected Content