कडू व राणा वादात आज मुख्यमंत्री करणार मध्यस्थी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बच्चू कडू आणि रवी राणा या अमरावती जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वादामुळे सत्ताधार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. विशेष करून राणा यांनी थेट कडूंवर खोके घेतल्याचे जाहीर आरोप केल्याने याबाबत मोठा संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. या प्रकरणात आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरून दोन्ही नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असतांनाही याचा फारसा परिणाम झालेला नाही. यामुळे आज अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांना मुंबईत बोलावून घेतले आहे.

आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बच्चू कडू आणि रवी राणा यांना भेटणार आहेत. या भेटीत ते दोघांची समजूत काढून जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप करणे टाळावे अशा सूचना देतील ही माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी आज दुपारी भेट होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Protected Content