स्थानिक नेतृत्वाला प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेले आहे. त्याचवेळी शिवसेनेने विधान परिषदेसाठी दोन उमेदवारांची निश्चिती करीत स्थानिक नेतृत्वाला प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलेलं असताना विधानपरिषद निवडणुकीसाठी देखील उमेदवार निश्चित केल्याची चर्चा आहे. यात आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी सोडणारे सचिन अहिर आणि २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभूत झालेले धडगाव- अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेचे आमशा पाडवी यांच्या नावाची निश्चिती करण्यात आली आहे. एकूणच शिवसेनेने कोल्हापुरात संजय पवार आणि धडगाव अक्कलकुवा मधून आमशा पाडवी या स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्याचे दिसून येत आहे.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठिंबा द्या, त्या बदल्यात विधानपरिषदेची एक जागा भाजपासाठी देऊ, असा प्रस्ताव मविआकडून देण्यात आला होता. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे राज्यसभा निवडणुका होणार असून आता लगेचच विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोन नावांची निश्चिती करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

Protected Content