आश्रम शाळा कर्मचाऱ्यांचे विराट धरणे आंदोलन

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासी विकास आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना आणि  महाराष्ट्र राज्य या संघटनेचे विराट एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन अध्यक्ष डॉ. डी एल कराड व सरचिटणीस प्रा.बी. टी. भामरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर पार पडले.

सदर आंदोलनात राज्यभरातून १० हजाराहून अधिक आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते .ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणे होती. आश्रम शाळांची वेळ पूर्ववत ११ ते ५ करणे, शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करणे, रोजंदारी कर्मचारी ,कंत्राटी (कला, क्रीडा ,संगणक )कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे ,”काम नाही वेतन नाही” हे अन्यायकारक धोरण रद्द करून अनुदानित आश्रम शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे दहावी व बारावीचे निकाल कमी लागल्यास घोषित करण्यात आलेल्या अन्यायकारक शिक्षा रद्द करणे ,मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देणे, असं शाळांतील रिक्त पदे भरणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे ,नवीन आकृती बंदा नुसार रद्द झालेली ६५ हजार पदे  पुनर्जीवित करणे यासारख्या महत्त्वपूर्ण मागण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

सदर  आंदोलनाला सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यापक पाठिंबा मिळाला. आश्रम शाळा शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते ना. अंबादास  दानवे, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, अमरावती शिक्षक मतदार संघाचे आ.किरण सरनाईक, आ. कुणाल पाटील, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आ.विनोद निकोले, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे आंदोलन स्थळी आवर्जून उपस्थित होते.

सदर आंदोलनाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांनी लेखी पाठिंबा जाहीर केला तर आंदोलनाची दखल घेत शिवसेना युवा नेते श्री आदित्य ठाकरे यांनी थेट महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहीत, सदर मागण्यांवर तातडीने सकारात्मक विचार करण्याची विनंती केली ,तसेच श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष श्री विवेक भाऊ पंडित (विशेष मंत्री दर्जा) यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहीत विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन आश्रम शाळांची वेळ पूर्ववत ११ ते ५ करण्याची आग्रही मागणी केली. आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष श्री काळुराम धोदडे यांनीही सदर आंदोलनाला लेखी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, शालेय व्यवस्थापन समिती यांनी आश्रम शाळांची वेळ ११ ते ५ होण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.

शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ येणे अत्यंत दुर्दैवी असून, आश्रम शाळा शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घडवून देईल, तसेच वेळेचा प्रश्न व इतर समस्या मार्गी लागेपर्यंत मी कायम तुमच्या सोबतच असेन असे आश्वासन विधान परिषद विरोधी पक्ष नेते श्री अंबादासजी दानवे यांनी उपस्थित आंदोलन कर्त्यांना दिले.

 

Protected Content