रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाल येथील वन विभागाच्या झूलत्या पुलाची दुर्दशा झाली असून तो दुरुस्त करण्यात वन विभागाकडून दिरंगाई करण्यात येत आहे. यामुळे पर्यटकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील ठंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाल हे वन विभागाचे सुंदर आणि देखणे पर्यटनस्थळ आहे. राज्य व पर राज्यातुन मोठ्या संख्येने पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. येथील सर्वात मोठे आकर्षण आहे तो इथे असलेला झूलता पूल. वन विभागाचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने या पुलावरुन चालण्यासाठी लावण्यात आलेले पत्रे उखडले आहेत. यामुळे पर्यटकांना ये-जा करण्यात अडचण निर्माण होत असते, त्यांची दुरुस्ती करण्याकडे वन विभागातर्फ़े अक्षम्य दिरंगाई करण्यात येत आहे.
हा झूलता पुल आधीही बंद होता, तेव्हा दोन्ही बाजुंनी काटे टाकून तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होतो. त्यानंतर सुमारे २.५० लाख रूपये खर्च करून तो मध्यंतरी दुरुस्त करण्यात आला होता. संपूर्ण पुलावर पत्रा लावुन तो पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. आता पुन्हा त्याची दूरवस्था झाली आहे, त्याचे पत्रे उखडल्याने त्यावरुन ये-जा करणा-यांच्या पायाला दुखापत होऊ शकते. लहान मुलेच खेळण्यासाठी या झूलत्या पुलाचा आनंद घेत असतात. पुलाच्या दुर्दशेमुळे वन विभागाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत असून त्याच्या दुरुस्तीबाबत दिरंगाई करु नये, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.