अमळनेर शहरात दर सोमवारी ‘जनता कर्फ्यू’

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरात दर सोमवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याआधी अमळनेर शहरात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याची जाहीर करण्यात आले होते. तथापि, याला व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला. या अनुषंगाने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी व व्यापार्‍यांची बैठक घेण्यात आली. यात दर सोमवारी अमळनेरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. दर सोमवारी वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने, कृषी दुकाने, दुग्ध व्यवसाय या व्यतिरिक्त सर्व दुकानदार, व्यावसायिकांना पाळावा लागणार आहे. दरम्यान, याच दिवशी अमळनेर नगर पालिकेने जाहीर केलेला नो व्हेइकल डे सुध्दा पाळण्यात येणार आहे.

या बैठकीला नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, व्यापारी प्रतिनिधी बिपीन कोठारी, बापू हिंदुजा, रमेश जीवनानी, अशोक हिंदुजा, मनीष जोशी, अशोक वाधवानी उपस्थित होते.

Protected Content