वीज तोडणे बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार ! : आ. अनिल पाटलांचा इशारा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्र्यांनी जाहीर करून देखील शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडली जात असल्याने आमदार अनिल पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शेतकरी बांधवांच्या तोंडाशी घास आलेला असताना आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी कुणाचेही वीज कनेक्शन कापले जाणार नाही असे आश्वासन दिले असताना महावितरण कडून सर्रासपणे शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी संतप्त होऊन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

या संदर्भात आमदार अनिल पाटील यांनी निवेदन जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की मागील डीपीडिसी च्या बैठकीत जळगाव जिल्ह्यात कपाशी,बाजरी,ज्वारी,मका यासह इतर पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने विजे अभावी या पिकांचे नुकसान होऊ नये आणि शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊ नये यासाठी बिलापोटी कुण्याही शेतकर्‍याचे वीज कनेक्शन कापले जाऊ नये अशी मागणी आपल्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. यावर दोन्ही मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कुण्याही शेतकर्‍याचे वीज कनेक्शन कापू असे आदेश दिले असल्याने कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन कापण्याची कारवाई होणार नाही व शेवटचे बिल देखील टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा दिली जाईल असे आश्वासित केले होते.

असे असताना आता याच सरकारच्या अखत्यारितील महावितरण कंपनीने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे आदेश डावलून सर्रासपणे वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे आता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि मंत्रीमहोदय शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे त्यांचेच सरकार शेतकर्‍याला कसा मारता येईल आणि आपली तिजोरी कशी भरता येईल याचा कट रचतात ही मोठी शोकांतिका असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांवरील हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही,एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीना पुन्हा विनंती करतो की शेतकर्‍यांच्या पिळवणूकीचा हा अन्यायकारक प्रकार तात्काळ थांबविण्याचे आदेश महावितरण ला देऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी बांधवांसोबत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल असा इशारा आमदार अनिल पाटील यांनी दिला आहे.

Protected Content