शेतकर्‍यांना मदत मिळवून देणार ! : आ. अनिल पाटील

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात आपण शेतकरी हिताचे प्रश्‍न उपस्थित करून शेतकर्‍यांना मदत मिळवू देणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आज दिनांक १७ ऑगस्टपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनासाठी आमदार पाटील मुंबईत दाखल झाले असून मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी संपुर्ण तयारी त्यांनी केली आहे,तत्पूर्वी अधिवेशनात प्रमुख कोणत्या समस्या मांडणार याविषयी त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केली आहे.

यात आमदार अनिल पाटील यांनी नमूद केले आहे की अमळनेर तालुक्यात २०१९ आणि २०२१ मध्ये दोन वेळा अतिवृष्टी होऊन शेतकरी बांधवाचे मोठे नुकसान झाल्यानंतर नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव शासनाकडे सादर झाले आहेत. यासंदर्भात आपण शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उच्च स्तरीय कमिटीने मान्यता दिल्याने २०१९ मधील काही शेतकर्‍यांना पैसे मिळाले. मात्र काही शेतकरी वंचित राहिले होते. यावर संबंधीत समितीने राहिलेल्या शेतकर्‍यांना देखील पैसे वितरित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गेल्याने हे पैसे रोखून धरण्याचे पातक या शासनाने केले असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, यासंदर्भात आम्ही विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळासह राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन अतिवृष्टीचे वितरित करण्याची मागणी केली होती. परंतु त्यानंतरही काहीच निर्णय या शासनाने घेतला नसल्याने आता आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात हा प्रश्न जोरदारपणे उचलून पीडित शेतकर्‍यांना पैसे देण्यास शासनाला भाग पाडणार असा विश्वास आ अनिल पाटील यांनी यात व्यक्त केला आहे.

मतदारसंघातील विकासकामे थांबवली

दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की महाविकास आघाडी शासनाकडे आपण सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधीच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यात प्रामुख्याने अमळनेर शहरातील बाजार पेठेसह प्रमुख रस्त्यांसह ग्रामिण भागातील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय सिंचन विभाग,सामाजिक न्याय विभाग, जलसंधारण विभाग,नगरविकास विभाग ,कृषी विभाग आणि रोजगार हमी अंतर्गत महत्वपूर्ण विकासकामांसह शहर व ग्रामीण भागातील अनेक विकासकामे यात आहेत. सदर कामांना निधीही वितरित होणार होता. त्याआधीच महाविकास आघाडी शासन गेल्याने त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारने या कामांना स्थगिती देण्याचे पाप केले आहे. प्रत्यक्षात जनहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी ही कामे असल्याने ती रोखून धरणे अन्यायकारक आहे. यासंदर्भात विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे या कामांना निधी वितरित करण्याची मागणी आपण नुकतीच केली आहे. यात पुन्हा अधिवेशनात आवाज उठवून सदर मंजूर कामांचा निधी वितरित करण्यास भाग पाडल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगत इतर प्रश्न देखील अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

पाण्याखाली येणार्‍या शेतजमिनीचा प्रश्नही मांडणार

तालुम्यातील पातोंडा सर्कल मध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होत नसल्याने शेकडो हेक्टर जमीन दोन तीन महिने पाण्याखाली असते. वर्षोनुवर्षे हीच परिस्थिती रहात असल्याने ही जमीन नापीक होऊन शेतकरी हतबल होत चालला आहे. त्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

Protected Content