मांडळच्या तरूणाचा तरूणाचा उष्माघाताने बळी !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असतांनाच तालुक्यातील मांडळ येथील तरूणाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जितेंद्र संजय माळी (वय ३३) यांचा उष्णतेचा फटका बसल्याने मृत्यू झाला. जितेंद्र माळी हा खमण विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. यानुसार परिसरातील गावांमध्ये खमण विक्री करून तो दुपारी बाराच्या सुमारास घरी आला. यानंतर शेतात जाऊन त्याने काम केले.

सायंकाळी त्याला शेतात भोवळ आली. त्याचा चुलत भाऊ महेंद्र काशीनाथ माळी यांच्यासह शेतातील अन्य मजुरांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून जितेंद्रला अमळनेरला घेऊन जाण्याचे सुचविले. यानुसार अमळनेरला नेत असताना तो रस्त्यात बेशुद्ध पडला. ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, शवविच्छेदनातून जितेंद्र संजय माळी यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोस्टमार्टेम करणारे डॉ.आशिष पाटील यांनी त्याला उष्माघात सदृश लक्षणे होती, मेंदूत रक्तस्राव झालेला होता असे सांगितले. दरम्यान, नागरिकांनी दुपारी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Protected Content