अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करत राज्यात १७वे, नाशिक विभागात तिसरे, तर जळगाव जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पणन संचालनालयामार्फत विविध निकषांवर ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे.
या मागे बाजार समितीने एकूण १४१ गुणांची कमाई केली असून त्यामध्ये पायाभूत व सेवा सुविधा या निकषांवर ४४.५ गुण, आर्थिक कामकाज निकषावर ३० गुण, वैधानिक बाबींमध्ये ४८ गुण आणि इतर निकषांवर १९ गुण मिळाले आहेत.
या यशामागे बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, सचिव डॉ. उन्मेष राठोड, तसेच अधिकारी, कर्मचारी, विद्यमान संचालक मंडळ, हमाल, मापाडी, गुमास्ता, व्यापारी आणि शेतकरी यांचे मोठे योगदान आहे. १६ मे २०२३ रोजी सभापतीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या अशोक पाटील यांच्या नेतृत्वातच हे उल्लेखनीय यश साध्य झाले आहे.
बाजार समितीचा विस्तार, वाढलेली आवक, शेतकऱ्यांना थेट रोखीने देण्यात येणारे पेमेंट, व्यापारी व हमाल-मापाड्यांचे शेतकऱ्यांप्रती असलेले सहकार्य, तसेच पारदर्शक कारभार या सर्व घटकांनी समितीच्या यशाला हातभार लावला आहे.
माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार स्मिता वाघ आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने सत्ताधारी आणि विरोधक गटातील संचालकांनी दिलेले सहकार्यही समितीच्या या यशामध्ये मोलाचे ठरले आहे, असे सभापती अशोक पाटील यांनी नमूद केले.