जिल्हा अपघात विरहित करण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे : न्या. जी. ए. सानप

2ab53f13 f3c3 4ce2 97ac f49eec55440f

 

जळगाव (प्रतिनिधी) वाहतुक नियमांचे पालन करुन वाहन चालविल्यास स्वत: बरोबरच दुसऱ्यांच्याही जिविताचे संरक्षण होईल. याकरीता सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून जिल्हा अपघात विरहित होण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी आज केले. येथील जी. एस. ग्राउंडवर 31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2020 चे उद्घाटन न्या. सानप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

 

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटक्के, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर आदि उपस्थित होते.

न्या. सानप पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांने घराबाहेर पडतांना वाहतुक नियमांचे पालन करण्याचा ठाम निश्चिय करुनच घराबाहेर पडावे. वाहन चालवितांना आपल्याबरोबरच इतरांचीही काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. याकरीता सर्व संबंधितांनी वाहतुक नियमांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहनही केले. रस्ते सुरक्षा अभियानाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, वाहतूक नियम आपल्या भल्यासाठीच आहेत याची जाणीव नागरीकांमध्ये होणे आवश्यक आहे. हेल्मेट वापरणे ही केवळ औपचारिकता न राहता ते वापरल्याने अपघातात आपला जीव वाचू शकतो याचेही भान असणे आवश्यक आहे. प्रवास करतांना आपले संरक्षण आपल्याच हातात आहे याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाला होणे आवश्यक आहे. यामुळेअपघाताचे प्रमाणही कमी होईल. अनेक अपघात हे वेग मर्यादा न पाळल्यामुळे होत असतात. तेव्हा वाहनचालकांनी वाहन चालवितांना वेगमर्यादा पाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन म्हणजे आपल्यावर लादलेले आझे न समजता ते आपल्या सुरक्षेसाठी आहे अशी भावना ज्यावेळी जनमानसात निर्माण होईल तेव्हा‍ वाहतुक नियम पालनाविषयी सक्ती करण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक नागरिकाने, वाहनचालकाने आपल्याबरोबरच दुसऱ्याच्याही जिवीताची काळजी घेतल्यास जिल्हा अपघात विरहित होण्यास मदत होईल. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी शहर आणि परिसरात विविध विकासाची कामे सुरू आहे. त्यामुळे नागरीकांनी वाहने चालविताना काळजी घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील अपघातांची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. हेल्मेटला भार न मानता किंवा केवळ औपचारिकता न समजता ते आपल्या संरक्षाणासाठी असल्याचे मान्य करून ते दुर्देवी अपघातात वरदान ठरत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना मागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. राजेंद्र देशमुख व सुनिता मराठे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी मानले. कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस, राज्य परिवहन विभाग, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content