मान्सून काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मान्सून काळातील सर्व यंत्रणांनी आपआपसात योग्य समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थीतीत आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही याची काळजी घेत दक्ष राहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

सर्व विभागांनी आपल्या विभागाचे स्ट्रक्चरल  ऑडीट, फायर ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडिट करुन घ्यावे. त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग करताना नदी काठच्या गावांना वेळोवेळी सूचना कशा पोहचतील याबाबत काळजीपूर्वक कार्यवाही करावी.  वैद्यकीय पथकांनी त्यांच्या सेवा घटनास्थळावर कशा पोहचतील. याचा आराखडा तयार ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

यावेळी ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची तयारी’ याबाबत आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, मंत्रालय, मुंबईचे प्रशांत वाघमारे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची कार्य प्रणाली, आपत्कालीन नियंत्रण कक्ष तसेच शासनाकडून राज्यात सर्व जिल्हयांनी कार्यान्वित करण्यात येत असलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गाव, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समन्वय स्थापन करण्यासाठी Incident Response System  विकसित करण्यात आलेल्या प्रणाली बाबत उपस्थित अधिकाऱ्यांनाही सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे संचलित सेन्दाई फ्रेमवर्क आधारित कार्य प्रणाली अंतर्गत २०३० पर्यंत जळगाव जिल्ह्याच्या वातावरणातील होणारे बदल व त्याचा सर्व क्षेत्रावर होणार परिणाम याबाबत मुद्देसूद माहिती दिली. सादरीकरणात EOC ( Emergency Operating Center) मार्फत कशा पद्धतीने जिल्हयात कार्यवाही करण्यात येईल याबाबत माहिती देण्यात आली.

बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा शल्य चिकित्सक, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते.

Protected Content