चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील रहिवासी हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर काल (दि.२२) रात्री ८.३० च्या सुमारास सतत कोसळत असलेल्या पावसामुळे कोसळून एक लाख रुपयांपर्यंत वित्तहानी झाली आहे.
घर पडल्याने या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. काल रात्री पाऊस सुरू असल्याने हे कुटुंब घरातच बसून होते, अचानकपणे घराची एक भिंत कोसळताच सर्वजण घाबरून बाहेर पडले आणि काही क्षणातच १२ पत्र्यांचे घर जमीनदोस्त झाले. अगदी थोडक्यात कुटुंबाला होणारी इजा टळली. आताही हे कुटुंब घराबाहेर बसून शासनाच्या मदतीची वाट पहात आहे. पत्नी, चार मुले व वडील असा यांचा परिवार आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून शासकीय मदत देण्यात यावी, अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.