शपथ घेतल्यानंतर ‘या’ केंद्रीय मंत्र्यांनी घेतली माघार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर रविवारी एनडीएचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या शपविधीदरम्यान पंतप्रधानांसह एकूण 72 मंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथ देण्यात आलेल्यांमध्ये केरळमधील खासदार सुरेश गोपी यांचाही समावेश होता. पण शपथ घेतल्यानंतर काही तासातच सुरेश गोपी यांनी आपल्याला पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली आहे. आपल्याला मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच आपण काही चित्रपट साईन केले असून, काहीही करुन त्या पूर्ण करायच्या असल्याचं म्हटलं आहे.

“खासदार म्हणून काम करणं हेच माझं उद्दिष्ट आहे. मी काहीही मागितलेलं नाही. मला या पदाची गरज नाही असं मी म्हटलं होतं. मला वाटतं की, मला लवकरच या पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहित आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखरच चांगलं काम करेन. मला माझे चित्रपट कोणत्याही किंमतीत पूर्ण करायचे आहेत,” असे सुरेश गोपी यांनी शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सांगितलं.

सोमवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या नियोजित बैठकीपूर्वी सुरेश गोपी यांनी हे विधान केलं आहे. सुरेश गोपी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांच्यासह केरळमधील भाजपाचे एकमेव उमेदवार होते ज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. मोदी 3.0 मंत्रालयात सुरेश गोपींचा समावेश करत भाजपला 2026 मध्ये केरळात होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण किती गंभीर आहोत हे दाखवायचं आहे.

सुरेश गोपी यांनी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आणि केरळमधील भाजपाचे पहिले खासदार म्हणून इतिहास रचला आहे. सुरेश गोपी यांनी तिरंगी लढतीत सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसने के मुरलीधरन यांना त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सुरेश गोपी यांनी ‘त्रिशूरसाठी केंद्रीय मंत्री, मोदींची हमी’ अशा घोषणा देऊन आपल्या उमेदवारीचा जोरदार प्रचार केला.

Protected Content