बुलढाण्यात केस गळतीनंतर आता आली नख गळती !

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “बुलढाणा जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?” असा सवाल सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वत्र ऐकू येत आहे. काही दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यात अचानक उद्भवलेल्या केसगळतीच्या विकाराने संपूर्ण जिल्हा हादरला होता. नागरिकांनी अनुभवलेल्या टक्कल पडण्याच्या समस्येमुळे प्रशासनाची पळापळ झाली होती आणि आरोग्य यंत्रणा सजग झाली होती. त्या घटनेला अजून अहवालही आलेले नाहीत, तोपर्यंत आता नखांचे विकार पुन्हा नव्या चिंतेला जन्म देत आहेत.

सध्या शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमध्ये नागरिकांना नखं गळण्याची आणि विविध नख विकारांची समस्या भेडसावत आहे. विशेषतः बोंडगाव आणि त्याच्या परिसरातील गावांमध्ये या विकाराचे प्रमाण अधिक असून नागरिक भयभीत आहेत. या विकाराचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. या भागात काही महिन्यांपूर्वी ‘टक्कल व्हायरस’ नावाने ओळखली गेलेली एक केसगळतीची लाट आली होती. सुमारे ७०% नागरिकांचे केस गळून टक्कल पडले होते. नंतर काही काळाने केस परत उगवू लागले, पण त्या विकाराच्या मूळ कारणांची अधिकृत माहिती आजही उपलब्ध नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि आरोग्य विभागाने तपासणी केली असली तरी अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे.

आरंभिक अंदाजानुसार, पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण ५४% पर्यंत वाढलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे केसगळती झाली असावी, असा तर्क लावला जात आहे. मात्र नख विकार आणि या नायट्रेटच्या संदर्भात कोणतेही वैद्यकीय नाते अद्याप सिद्ध झालेले नाही. या नव्या आजारात नागरिकांच्या नखांमध्ये पुढील प्रकारच्या समस्या दिसून येत आहेत :नख गळणे, नखांमध्ये गडद रंग बदल, नखे कमकुवत होणे व फुटणे, नखाखाली वेदना आणि सूज

या समस्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन पुन्हा सक्रिय झाले असले तरी ठोस उपाययोजना वा निष्कर्ष अद्याप नाहीत. नागरिकांच्या मागणीनुसार, या भागात विशेष वैद्यकीय शिबिरे, पाणी तपासणी आणि सार्वजनिक जनजागृती मोहिमा त्वरित राबवाव्यात. अचानक होणाऱ्या या आरोग्यविषयक समस्यांनी नागरिक पुरते गांगरले आहेत. “आमचं आयुष्य नखे आणि केसांमध्ये अडकून पडलंय, हे काय नवं संकट?” असा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर उमटतोय. आयसीएमआरचा अहवाल लवकर जाहीर व्हावा आणि त्यानुसार आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Protected Content