कौटुंबिक वादानंतर विहीरीत आढळला विवाहितेचा मृतदेह

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरघुती वादातून घरातून निघून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह पळासरे येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री उघडकीला आली. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कविता गोकुळ जगताप (वय-२१) रा. वरखेड बुद्रुक ता.चाळीसगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,चाळीसगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे कविता जगताप या महिला आपले पती गोकुळ जगताप यांच्या सोबत वास्तव्याला होत्या. त्याचे घरात कौटुबिक वाद झाला होता. शनिवारी २३ सप्टेंबर रोजी रात्री त्या शौचास जावून येते असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. दरम्यान त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायती पळासरे पाणीपुरवठा विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक कुशल शिंपी करीत आहे.

Protected Content