अमळनेरातील १५ गावांना मिळाली पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने जलजीवन अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याने यातील १५ गावांना प्रशासकीय मान्यतेची पत्रे जळगावातील संबंधित गावांच्या सरपंचांना वितरित करण्यात आली.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या प्रशासकीय मान्यता वितरित करण्यात आल्या. अमळनेर मतदारसंघातील अंबारे- खापरखेडा, कोंढावळ, हिंगोणे बु, ढेकु सिम, रुंधाटी, नांदगाव, वाघोदे, कावपिंप्री, लोण सिम, लोण खुर्द, सोनखेडी, दापोरी बु, लोण चारम, झाडी, शेवगे बु व दळवेल इत्यादी गावांच्या उपस्थित सरपंच व इतर पदाधिकारी यांना हे मान्यता पत्र देण्यात आले,यावेळी सर्वांनी पालकमंत्री व आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.

हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा – आ. अनिल पाटील

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असलेले ना गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळात आर्थिक तुटवडा असताना देखील जीवन प्राधिकरण व येथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी मोठा निधी मिळवला, म्हणूनच मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजनांना निधी मिळाला आहे, यापूर्वी कधीतरी कामे मंजूर होऊन सरपंचाना याचा पत्ताही राहत नव्हता, थेट एजन्सी गावात काम करण्यासाठी आल्यानंतर गावाला योजनेची माहिती होत होती. पण भाऊंनी एक वेगळा पायंडा पाडत एकाच वेळी अनेक सरपंचाच्या हातीच प्रशासकीय मान्यता ठेवल्याने हा दिवस नक्कीच सुवर्ण अक्षरांनी ठेवण्यासारखा आहे, लवकरच या गावांची टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामही सुरू होणार आहे. पुढील टप्प्यात इतर प्रस्तावित गावांना देखील याच पद्धतीने प्रशासकीय मान्यता दिल्या जातील अशी ग्वाही देत सदर योजनांच्या मंजुरीबद्दल मतदारसंघाच्या वतीने आमदारांनी पालकमंत्र्याचे विशेष आभार व्यक्त केले. तर पालकमंत्रीनी देखील आमदारांना आपल्या मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांबद्दल असलेल्या कळकळीचे कौतुक केले.

Protected Content