धावत्या रेल्वेखाली तरूणाने संपविली जीवनयात्रा; कारण अस्पष्ट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेत जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या पवन राजेंद्र बाविस्कर (वय २२, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची  घटना सोमवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे पवन बाविस्कर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याने पदवीपर्यंचे शिक्षण घेतले होते. सोमवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी त्याने घरच्यांना मी जळगाव येथे बँकेच्या कामानिमित्त जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. त्यानंतर तो कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ येवून त्याने जळगाव ते पाळधी दरम्यान अपलाईनवर खांबा क्रमांक ३०१/ ७ ते ९ दरम्यान, रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, गुलाब माळी व अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली.

Protected Content