अमळनेर तालुक्यात उष्माघाताचा बळी; सात्री येथील घटना

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सात्री गावात राहणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाम हिरकण भिल वय ४७ रा. सात्री ता. अमळनेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सात्री गावात शाम भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी १० मे रोजी शाम भिल हे शेतात कामावर गेले होते. सायंकाळी ते घरी आले नाही. म्हणून त्यांची आई व मुलगा यांनी शाम यांचा शोध घेतला असता बोरी नदीच्या काठावरील सोमनाथ पाटील यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या गाडी रस्त्यावर बेशुध्दावस्थेत आढळून आले. त्यांना खासगी वाहनातून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी उष्माघातामुळे मयत घोषीत केले. मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास मुकेश साळुंखे हे करीत आहे.

Protected Content