अट्टल खिसेकापू टोळी जेरबंद, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त!


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातून खिसे कापून चोरी करणाऱ्या टोळीतील तीन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २५ जून रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे. तिघेही आरोपी हे अमरावती जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून रोकड, पाच मोबाईल आणि इंडीका कार असा एकुण साडेपाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने गुरूवारी २६ जून रोजी दुपारी ५ वाजता प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे खिसे कापून पैसे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या. जळगाव बसस्थानक आवारात अमरावतील येथील काही रेकॉर्डवरील गुन्हेगार हे खिसे कापणारे गुन्हेगार असल्याची गोपनिय माहिती एलसीबी पथकातील पो.कॉ. प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली.

त्यानुसार एलसीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील आणि रविंद्र कापडणे यांनी बुधवारी २५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. चौकशीत अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव सकीनगर, अमरावती) आणि अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९, रा. सुपिया मजिद समोर, अमरावती) अशी नावे असल्याचे सांगितले. तिघांनी बसस्थानक चोरी केल्या कबुली दिली.

आरोपींच्या अंगझडती व वाहनाची तपासणी केली असता, पोलिसांना त्यांच्याकडून ३३ हजार ८३० रूपयांची रोकड, १७ हजार ५०० किंतीचे पाच मोबाईल, एक रेक्झीन बॅग आणि ५ लाख रुपये किंमतीची इंडीका कार असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.