म्हाडा कॉलनीवासियांसमोर समस्यांचा डोंगर; मुख्याधिकार्‍यांना निवेदन

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील म्हाडा कॉलनीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून याचे निराकरण करावे अशी मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

भुसावळ शहरातील सर्व्हे क्रमांक ३३/१ ब म्हाडा कॉलनी व म्हाडा कॉलनीस लागून असलेल्या आजू बाजूच्या परिसरातील मुख्य रस्त्यांना लागून रहात असलेले रहिवाशी तसेच कॉर्नरच्या रहिवाशांनी अतिक्रमण केलेले आहे. यामुळे या भागातील रहिवाशी त्रस्त झाले असून अतिक्रम केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी दिनांक २३ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना रहिवाशांनी निवेदन दिले.

म्हाडा कॉलनी व म्हाडा कॉलनीस लागून असलेल्या आजू बाजूच्या परिसरातील मुख्य रस्त्यांना लागून रहात असलेले रहिवाशी तसेच कॉर्नरच्या रहिवाशांनी सर्व्हे क्रमांक ३०० /१ ब मध्ये अतिक्रमण केलेले आहे. कॉलनीतील रहिवाशांनी शासकीय तसेच नगरपालिका नियमांचा विचार न करता गटार बंद करून वापरायचे रस्त्यात नियमबाह्य बांधकामे केलेली आहे.तसेच नवीन बांधकाम सुरु असून त्यांचे बांधकाम मटेरियल साहित्य रस्त्यात टाकून ठेवतात. सदर ७/१२ उतार्‍यावरील जागा व प्रत्यक्षात केलेले बांधकाम यात तफावत असून त्यामुळे रस्ते निमुळते होवून रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.

या अनुषंगाने आज मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यात कॉलनीतील रस्त्यांची मोजणी करून रस्ते रहदारीस मोकळे करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोणारी मंगल कार्यालयाजवळील पंप हाऊसला लागून असलेल्या गटारींवर काँक्रीट ढापा टाकावा. मंगल कार्यालयात बाराही महिने लग्न कार्य सुरू असल्यामुळे मंडप तसेच वाहने अवास्तव रस्त्यात अडथळा करून उभी असतात. यामुळे रहिवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे.गटारी साफ करण्यासाठी सफाई कर्मचारी येत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.म्हाडा अंतर्गत सिमेंटचे पाईप लाईन अनेक ठिकाणी क्रॅक झाल्याने नेहमी पाण्याची नासाडी होत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. २० वर्षांपासून बांधकाम करण्यात आलेल्या गटारी तुटलेल्या असून त्वरित ढापे लावण्यात यावे असे मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले असून अतिक्रमण धारकांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करून कॉलनीतील रहिवाशांना सहकार्य करावे तसेच मागण्यांचे निरसन करावे. तसेच वरील मागण्यांचे गांभीर्याने विचार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.

या  निवेदनावर उत्तम कोळी,धनराज बाविस्कर,संदीप झारखंडे,धर्मा चव्हाण,श्याम वलकर,ललित नेहते,सचिन राजपूत,विनायक सोनार,एकनाथ गवाळ,मनीष रावडकर,गुल्लू गालफडे,सौ.उषा बाविस्कर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

 

 

 

Protected Content