जागेच्या वादातून दाम्पत्याला चौघांकडून बेदम मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे गावात जागेचा वाद निर्माण करून दाम्पत्याला शिवीगाळ करून लोखंडी रॉड आणि चाकूने वार करून जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शनिवार रोजी अमळनेर पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे गावात प्रदिप रामसिंग पाटील वय ५३ हे आपल्या पत्नी भारती पाटील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जागेचा वाद निर्माण झाल्याने गावात राहणारे निलेश नाना पाटील, प्रेमसिंग नाना पाटील, नाना गुलाब पाटील आणि मालूबाई नाना पाटील या चौघांनी प्रदीप पाटील व त्यांची पत्नी भारती पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर लोखंडी रॉड आणि चाकूने प्रदीप पाटील यांच्या वर वार करून गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या प्रदीप पाटील यांना अमळनेर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर अखेर शनिवारी १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.

Protected Content