“त्या” भीषण आपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावानजीकच्या मुंजोबा मंदीरासमोर कार व प्रवाशी पॅजो रिक्षाच्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मासमाबी शेख जुबेर अहेमद (वय-३०) रा. बोराखेडा ता. मोताळा जि.बुलढाणा असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावकडून (एमएच १९ बीयू ५८४३) क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून प्रवासी कलर घेवून बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ इए ५१०९) क्रमांकाच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडली.

कारने दिलेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर  रिक्षातील शेख जुबेर अहेमद शेख मेहबुब (वय ४०), रिक्षा चालक करीम बेग शरीफ बेग (वय-२९), शेख सादीक शेख इसार (४०) व शेख उमेमा फातीमा शेख जुबेर अहमद (वय ६) हे चौघेजण गंभीर जखमी झाले.

त्यांना नजीकच्या डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत शेख सादीक शेख इसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक दत्तू सुधाकर कोळी (वय-३९) रा. जळगाव याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

 

Protected Content