अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विकासकामांना गती देत शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर आणि पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत आमदारांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. विविध गावांमधील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतीपर्यंत पोहोच सुलभ व्हावी, वाहतुकीतील अडथळे दूर व्हावेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत ने-आण सुलभ व्हावी यासाठी रस्त्यांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीवरही बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. नागरिकांना पाण्याअभावी कोणतीही अडचण भासू नये यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले. विशेषतः टँकर मागणी संदर्भात प्राप्त झालेल्या तसेच भविष्यात येणाऱ्या सर्व प्रस्तावांना केवळ चार दिवसांच्या आत मंजुरी देण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, बांधकाम, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी आपल्या कामांचा सविस्तर आढावा सादर करत समन्वयातून कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे एकमत व्यक्त केले. प्रशासनातील विविध घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास विकासकामांना निश्चितच गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
समिती सदस्य आणि ग्रामस्थ प्रतिनिधींनीही आपल्या भागातील अडचणी मांडल्या. आमदारांनी त्यांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक स्तरावरील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन तत्पर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत मयूर भंगाळे, रुपेश कुमार सुराणा, डॉ. उल्हास देवरे, एन.आर. पाटील, विजयकुमार देवरे, भूषण कदम, नीना बाविस्कर, वैशाली जडे, आकाश भाई, एस.एस. खर्डे, डी.जी. जाधव, प्रकाश चव्हाण, महेश जाधव, ए.जे. परदेशी, जितेंद्र बुवा, वाय.ए. वंजारी, ए.आर. कोठावदे, एस.पी. गावित, एस.बी. देसले, एम.डी. चव्हाण, एच.के. पाटील, पी.ए. पाटील, गांगुर्डे साहेब, एस.व्ही. पाटील यांच्यासह अनिल सिसोदे, रिता बाविस्कर, गौरव उदय पाटील, चेतन काशिनाथ पाटील, महारु आत्माराम पाटील, सुरेश देवचंद पाटील, ललित भूपेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते.
ही बैठक केवळ आढावा न राहता ग्रामीण विकासाला ठोस दिशा देणारी ठरली. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पाणीटंचाईवर मात आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.



