भुसावळ, प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासुन कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव व त्यात लॉकडाऊन अशी विकट परिस्थिती असतांना नगर परिषदतेर्फे संपुर्ण भुसावळ शहरात कमालीचा अशुद्ध पाणी पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भुसावळकरांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
भुसावळ नगर परिषदेतर्फे कधी आठ दिवसातुन तर कधी दहा दिवसातुन भुसावळकरांना दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. पिण्याच्या पाण्याचा कर देऊनही त्यांना पिण्यासाठी स्वच्छ व नियमित पाणी मिळत नाही.अशा पाण्यामुळे शहरात कॉलरा, डायरीया,असे अनेक प्रकारचे साथीचे आजार होऊ शकतात याची भिती लोकांना वाटत आहे. तेव्हा या निवेदनाद्वारे आपणांस सुचीत करतो की,लोकांच्या जीवाशी न खेळता भुसावळ नगर परिषदेतर्फे संपुर्ण शहरात लोकांना नियमित व स्वच्छ तसेच व्यवस्थित आर.ओ.ने फिल्टर करुन पाणी पुरवठा करावा अन्यथा कोरोना जाण्यासाठी आम्ही जसे लढत आहोत तसे स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला लढावे लागेल असा इशारा दिला आहे. निवेदनावर योगेंद्र पाटील, भगवान मेढे, ईस्माईल गवळी, रहीम कुरेशी, महेंद्र महाजन आदींच्या स्वाक्षरी आहे.