चोपडा महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन

chopda 2

चोपडा प्रतिनिधी । येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने १७ फेब्रुवारी २०२० रोजी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सी.ए.ए.), ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ (एन.पी.आर.) व ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (एन.आर.सी.) या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डी.डी.कर्दपवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, डॉ.आर.आर.पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमात एकूण ५२ विद्यार्थी उपस्थित होते. या चर्चासत्रात ०७ विद्यार्थ्यांनी सी.ए.ए., एन.पी.आर. व एन.आर.सी. शी संबंधित विषयावर सादरीकरण केले. यात दिपक देविदास कोळी (एस.वाय.बी.ए.), हर्षल दगडू शिंपी (एस.वाय.बी.ए.),पूजा अभिमान मैराळे (टी.वाय.बी.ए.), प्रकाश भिकन बागुल (एम.ए.भाग१), शुभम रतिलाल भिल (टी.वाय.बी.ए.) व किरण राजेंद्र बागुल (एम.ए.भाग१) या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी चे सकारात्मक व नकारात्मक बाजू आपल्या विचारातून व्यक्त केले.

याप्रसंगी डी.डी.कर्दपवार यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची पार्श्वभूमी सांगून त्याविषयी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना माहिती दिली. बी.बी.पवार यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील महत्वपूर्ण घटकांवर प्रकाश टाकून आपले विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे व्ही.बी.पाटील यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयावर आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीतील घटनांविषयी जागरूक राहिले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पालीवाल व दिपाली भालेराव यांनी केले तर आभार व्ही.बी.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content