
जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील मादणी गाव परिसरातील रोजगार हमी योजनेचे कामे मजूरांकरवी न करता यंत्राच्या सह्हायाने करून ती कामे मात्र मजूरांनी केली असल्याचा खोटा अहवाल गावच्या सरपंचानी शासनस्तरावर पाठवून. शासनाची दिशाभुल करून भ्रष्टाचार केला आहे. त्याची निरपेक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी जामनेर पंचायत समीतीसमोर मादणी गावचे काही नागरिक उपोषणाला बसले होते. परंतु, आचारसंहिता सुरु असल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

मादणी येथील नागरिकांना आचारसंहिता लागू असल्याने उपोषण करू शकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र, यावेळी उपोषणकर्ते शिवाजी पाटील, फिरोज तडवी, गणेश पाटील यांनी महिनाभराआधी झालेल्या कामाच्या चौकशीसाठी संबंधित पंचायत समिती अधीकारी यांच्याशी पत्र व्यवहार करून ही संबंधित प्रशासनकडून काही एक कार्यवाही होत नसल्याने त्यासाठी दिनांक ३ ऑक्टोबरला उपोषणाला बसण्याचा पत्र व्यवहार केला होता. तर मग आता संबधीत प्रशासनाकडून प्रकरणाची चौकशी न झाल्याने आम्ही उपोषणला बसलो. पण आचारसंहितेचे कारण पुढे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. यावेळी उपोषणकर्त्यांकडून प्रकरणाची माहीती जाणून घेण्यासाठी संजय गरूड, बंगाली सिहं चितोडीया हे हजर होते. गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी चौकशीचे आश्वासन देवून वेळ मारून नेली.


