Home Cities अमळनेर नाशिकच्या उपोषणाला अमळनेरमधून पाठिंबा; आदिवासी संघटनांचा शासनाला थेट इशारा, रास्ता रोकोची तयारी

नाशिकच्या उपोषणाला अमळनेरमधून पाठिंबा; आदिवासी संघटनांचा शासनाला थेट इशारा, रास्ता रोकोची तयारी

0
53


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी समाजातील मुलींच्या इतर समाजातील विवाहाच्या मुद्द्यावरून अमळनेर तालुक्यातील काही आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (२४ ऑगस्ट) प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथे सुरू असलेल्या उपोषणालाही या संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात आदिवासी समाजातील मुलींचे इतर समाजातील व्यक्तींशी होणारे विवाह तसेच कथितरीत्या मुलींची विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात समाजाची भूमिका कठोर राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा व्यक्तींशी सामाजिक संबंध ठेवले जाणार नाहीत, तसेच संबंधित कुटुंबाने ज्या समाजात विवाह केला आहे, त्या समाजात त्यांना समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील प्रलंबित प्रश्नांवर शासनाने योग्य ती दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथे सुरू असलेल्या उपोषणालाही संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गुलाब बोरसे, अमळनेर तालुकाध्यक्ष भैय्या सोनवणे, अमळनेर तालुक्यातील रावण ग्रुपचे अध्यक्ष नरेश चव्हाण, अजय भाऊ, सागर भाऊ, एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष आबा बहिरम, तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज मालचे, ढेकू गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब पवार, एकलव्य संघटनेचे जिल्हा सल्लागार विनायक सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते खैरनार दादा, पारधी समाजाचे कार्यकर्ते भुरा पारधी, नितीन भाऊ, राहुल भाऊ यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आदिवासी समाजातील सामाजिक प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि संबंधित निवेदनावर प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे आता लक्ष लागले आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने आगामी काळात या प्रश्नावर आंदोलनाची दिशा काय राहणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.


Protected Content

Play sound