Home Cities जळगाव सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावकरांचा नैतिक पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावकरांचा नैतिक पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन

0
38

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शवत तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या जतनाबाबत केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी जळगावातील जागृत नागरिकांच्या वतीने रविवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारपर्यंत तातडीने पोहोचविण्याची विनंतीही करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, युवक आणि जागरूक नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, या विषयांवर केंद्र शासनाने सकारात्मक संवाद साधून निर्णय घेण्याची गरज आहे. नागरिकांनी लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला शांततेच्या मार्गाने आपले मत व्यक्त करण्याचा आणि आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांबाबत दडपशाहीची भावना निर्माण होईल, अशा कोणत्याही कारवाया टाळल्या जाव्यात. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

जळगावातील जागृत नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी, पर्यावरणाशी आणि देशाच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करून ठोस धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांबाबत जबाबदारी स्वीकारून आवश्यक निर्णय घेण्यात यावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या मागण्यांवर केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक संवाद सुरू करून योग्य निर्णय घ्यावा, शांततापूर्ण आंदोलनावर कोणत्याही प्रकारची दडपशाही होऊ नये, विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर सर्वसमावेशक चर्चा व्हावी आणि लोकशाही पद्धतीने व्यक्त झालेल्या भावना व मागण्यांचा सन्मान राखून आवश्यक कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली असून, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनावर जळगावातील विविध क्षेत्रांतील जागृत नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, त्यांनी या विषयावर संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound