
मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तब्बल २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणातील माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देत आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राजकीय वैमनस्यातून झालेल्या या हत्याकांडाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी केला. त्यानंतर निंबाळकर कुटुंबाच्या मागणीनंतर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. या प्रकरणात सीबीआयने डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. तपासादरम्यान अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले तसेच विविध पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी ते पुरेसे नसल्याचे नमूद करत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश होता. तब्बल दोन दशकांच्या कायदेशीर लढाईनंतर आलेल्या या निकालामुळे राजकीय क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली असून, हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आपल्या वडिलांच्या न्यायासाठी गेली २० वर्षे लढा दिला, मात्र न्यायालयाचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला नसल्याने आता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही या निकालावर प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे. “पवनराजे निंबाळकर यांच्यासह एका व्यक्तीची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आणि तरीही आरोपी निर्दोष सुटतात, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे,” असे त्यांनी म्हटले. अशा निकालांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे एकेकाळी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या राजकारणातील जवळचे नातेवाईक आणि सहकारी म्हणून ओळखले जात होते. दोघांमध्ये सुरुवातीला अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. पाटील यांनीच पवनराजेंना राजकारणात पुढे आणले होते. तेरणा साखर कारखाना आणि मतदारसंघातील जबाबदारीही त्यांनी पवनराजेंवर सोपवली होती. मात्र, काळाच्या ओघात दोघांमधील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या आणि संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत दोघे राजकीय विरोधक म्हणून आमनेसामने आले. या निवडणुकीनंतर दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा होती.
कळंबोली येथील हत्याकांडानंतर सीबीआय तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा करण्यात आला होता. २००९ मध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान अण्णा हजारे यांच्या हत्येच्या कथित कटाचाही उल्लेख झाला होता. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालानंतर आता या प्रकरणात पुढील कायदेशीर लढाई उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या या हत्याकांडाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



