
मुंबई – वृत्तसेवा । घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर अतिरिक्त भार पडला आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना या दरवाढीचा फटका बसला असून विरोधकांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट करत दरवाढीमागे जागतिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

मध्यरात्रीपासून लागू झालेल्या या दरवाढीमुळे 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी मोठी दरवाढ मानली जात असून यामुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच वाढलेल्या असताना गॅस सिलेंडरच्या दरवाढीने नागरिकांची चिंता वाढली आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. “सातत्याने दरवाढ केली जात आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या संसारावर होत आहे. महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केला जातो, मात्र टप्प्याटप्प्याने नागरिकांना धक्के देण्याचे धोरण अवलंबले जात आहे. या निर्णयांची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी चुकवावी लागेल,” असे वक्तव्य त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या दरवाढीचे समर्थन करत जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. जगभरातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य वातावरणामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. केंद्र सरकार नागरिकांच्या अडचणींची जाणीव ठेवून काम करत असून परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. इंधनाचे दर वाढल्यावर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होतो आणि परिस्थिती सुधारल्यानंतर दर कमीही केले जातात, असेही त्यांनी नमूद केले.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ड्रग्जविरोधी मोहिमेचाही उल्लेख केला. राज्यभरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाया सुरू असून ड्रग्जचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस आणि विविध यंत्रणा सातत्याने काम करत आहेत. भविष्यातही अशा कारवाया अधिक प्रभावीपणे सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या पावसाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अल निनोच्या प्रभावामुळे काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली. मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक नियोजन करावे आणि दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन विविध उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ई-85 इंधन धोरणाबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक आणि शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार असून भविष्यात 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे राज्यातील कृषी आणि साखर उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



