जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभरातील औषध विक्रेत्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० मे २०२६ रोजी भारत बंदचे आवाहन केले असून, त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रीवरही होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या या आंदोलनामुळे अनेक ठोक व किरकोळ औषध दुकाने बंद राहू शकतात.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. अचानक औषधांची गरज निर्माण झाल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने ही सूचना केली आहे.

दरम्यान, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी केमिस्ट बांधवांना या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. औषधे ही अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने रुग्णांना औषधांचा पुरवठा न करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ व औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.
रुग्णांना औषधांच्या अभावामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संघटनांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार (मो. ९४२२३५६१४३) व श्रीमती क. र. पाटील (मो. ९८६०१७२५६१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



