रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील काही अधिकारी बाहेरगावाहून दररोज अप-डाऊन करत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे. संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय बागुल हे धुळे येथून, शाखा अभियंता रविंद्र इंगळे हे जळगाव येथून तर प्रशांत महाजन हे भुसावळ येथून दररोज रावेर येथे अप-डाऊन करत आहेत. त्यामुळे अनेकदा संबंधित अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिक विविध शासकीय कामांसाठी आणि विकासकामांच्या संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयात येत असतात. मात्र अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ग्रामस्थ दूरवरून येऊनही काम न झाल्याने निराश होऊन परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाकडून तातडीने सेवा आणि मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. परंतु संबंधित अधिकारीच वेळेवर कार्यालयात उपलब्ध नसतील तर सामान्य नागरिकांनी आपली समस्या मांडायची कुणाकडे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, रावेर तालुक्यातील विविध विकासकामांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित राहत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



