
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नरसापुर येथे घडलेल्या क्रूर घटनेच्या निषेधार्थ जळगाव शहरात आज भावनिक वातावरण निर्माण झाले होते. शेकडो चिमुकले आपल्या पालकांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत त्यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या वेळी लहानग्यांनी व्यक्त केलेला संताप आणि न्यायाची मागणी सर्वांनाच हेलावून टाकणारी ठरली.

सोमवार, दिनांक ४ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता शहरातील विविध भागांतून आलेल्या चिमुकल्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यांच्या हातात निषेधाच्या फलकांसह “आरोपीला फाशी द्या”, “आम्हाला न्याय हवा” अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांमध्ये घटनेबद्दल तीव्र संताप दिसून येत होता, तर पालकांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
या वेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः पुढे येत चिमुकल्यांशी संवाद साधला. लहान मुलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली भावना व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आर्त मागणी केली. या संवादादरम्यान काही मुलांच्या डोळ्यांत अश्रूही पाहायला मिळाले, ज्यामुळे वातावरण अधिकच भावनिक झाले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत, त्या राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली. त्यांनी मुलांना शांत राहण्याचे आणि प्रशासन न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. तसेच अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत शांततेत आंदोलन पार पडले. समाजातील विविध स्तरांतून या निषेधाला पाठिंबा मिळत असून, आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या घटनेने पुन्हा एकदा समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लहान मुलांनी पुढाकार घेत केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि समाज दोघांनाही जागे करणारा संदेश मिळाला आहे.



