जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र व राज्य शासनाच्या ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, गेल्या दोन वर्षांत दोन लाखांहून अधिक महिलांनी ‘लखपती दीदी’चा टप्पा गाठला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.

या योजनेचा मुख्य उद्देश स्वयं सहायता बचत गटांतील महिलांना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन देऊन त्यांचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपयांपर्यंत नेणे हा आहे. महिलांना लघुउद्योग, गृहउद्योग आणि उत्पादनाधारित व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 1 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात 1,06,078 महिलांनी हे उद्दिष्ट ओलांडले. यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. तर 2025-26 मध्ये 1,11,000 महिलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, सुमारे 750 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या उपक्रमामुळे महिलांकडून पारंपरिक तसेच मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होत असून, त्यांच्या वस्तूंना राज्यांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी वाढत आहे. परिणामी, महिलांना घरबसल्या रोजगार मिळून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की, स्वयं सहायता गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सहाय्य दिले जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत आहे.



