
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात गुरुवार, २ एप्रिल रोजी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांना अक्षरशः धडकी भरवली. जोरदार वारे आणि पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि काही वेळातच त्याचे तीव्र स्वरूप धारण झाले. रावेर शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. खानापूरजवळ एका चारचाकी वाहनावर झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. रात्रीची वेळ असल्याने शेतीतील नुकसानीचा अचूक अंदाज अद्याप लागलेला नाही. मात्र वाऱ्याच्या तीव्रतेमुळे पिकांचेही मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तत्काळ हालचाली करण्याच्या सूचना देवुन लवकर नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्याचा अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



