यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील उंटावद येथील उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने उत्कृष्ट कामगिरी करत यंदाही मार्च अखेर १०० टक्के कर्जवसुलीची परंपरा कायम राखली आहे. सलग अनेक वर्षे ही परंपरा टिकवून ठेवत संस्थेने पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला असून, या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. उंटावद या संस्थेने दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वीच संपूर्ण कर्जवसुली पूर्ण केली आहे. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांसाठी १०० टक्के वसुली करणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र संस्थेच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे आणि सभासदांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले आहे.

संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनीही या यशाचे कौतुक केले आहे. विभागीय उपव्यवस्थापक पी. एन. राणे, क्षेत्रीय अधिकारी ए. टी. तायडे, किनगाव शाखा व्यवस्थापक विनोदकुमार निळकंठराव देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
तसेच, संस्थेचे चेअरमन शशिकांत (शाशीआबा) गुलाबराव पाटील, सचिव संजय दिनकर महाजन आणि संचालक मंडळाच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही परंपरा कायम राखणे शक्य झाल्याचे मानले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार, संचालक विनोदकुमार पंडीतराव पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, कर्जवसुली व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे तसेच व्यवस्थापक आर. आर. पाटील यांच्यासह बँकेच्या सर्व संचालकांनी संस्थेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सहकार क्षेत्रात आदर्श ठरावी अशी ही कामगिरी असल्याचे मत व्यक्त होत असून, उंटावद सोसायटीने शिस्तबद्ध व पारदर्शक कारभारातून सभासदांचा विश्वास जपला आहे. त्यामुळे भविष्यातही संस्थेकडून अशाच उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



