Home राजकीय बिहारमध्ये महिलांच्या मतदानाची लाट; नितीश कुमारांच्या योजनांनी बदलला संपूर्ण राजकीय खेळ

बिहारमध्ये महिलांच्या मतदानाची लाट; नितीश कुमारांच्या योजनांनी बदलला संपूर्ण राजकीय खेळ

0
165

पटना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये अभूतपूर्व राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. NDA ला मिळालेल्या प्रचंड आघाडीमागे कोणाचा निर्णायक वाटा आहे, हा प्रश्न राज्यभर चर्चेत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या संपूर्ण निवडणुकीचा ‘गेमचेंजर’ ठरलेला वर्ग म्हणजे महिलांचा. विक्रमी 71.6 टक्के महिला मतदान झाले असून पुरुषांच्या तुलनेत तब्बल 10 टक्के अधिक मतदान करून महिलांनी संपूर्ण निवडणुकीचा खेळ पालटून टाकला आहे.

या निवडणुकीत पुरुषांचे मतदान 62.8 टक्के असताना महिलांचे मतदान 71.6 टक्क्यांवर पोहोचले. हा फरक केवळ आकड्यांचा नसून त्याने राजकीय नकाशाच बदलला. एक्झिट पोलपासून मतमोजणीपर्यंत सर्व सूचकांमध्ये महिलांनी NDA कडे झुकलेले स्पष्ट दिसले. ‘अर्धी लोकसंख्या’ म्हणून ओळखला जाणारा महिला वर्ग या वेळी निर्णायक भूमिकेत दिसला.

लालू प्रसाद यादव परिवारातील वाद, विरोधकांतील विस्कळीतपणा आणि NDA चे निवडणूक व्यवस्थापन याने वातावरण NDA च्या बाजूने झुकवले असले तरी महिलांनी दाखवलेल्या अभूतपूर्व सक्रियतेने निकालांवर थेट परिणाम झाला. विशेषतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या महिलांवर केंद्रित योजनांनी मोठा फरक पाडल्याचे राजकीय जाणकारांचे एकमत आहे.

नितीश कुमार यांनी लागू केलेली दारूबंदी ही महिलांसाठी सर्वात प्रभावी योजना ठरली. दारूमुळे निर्माण होणारे कौटुंबिक तणाव, घरगुती हिंसाचार आणि आर्थिक हानी कमी झाल्यामुळे महिलांनी या निर्णयाचे नेहमीच स्वागत केले होते. या योजनेमुळेच ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत महिलांनी NDA कडे विश्वासाने मतदान केल्याचे समोर येत आहे.

याशिवाय ‘जीविका दीदी’ योजनेने तर निवडणुकीत NDA साठी अलौकिक मदत केली. राज्यातील 1.30 कोटी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा थेट लाभ मिळाल्याने स्वयंसहाय्यता समूह मजबूत झाले. हातात आलेल्या थेट आर्थिक आधाराने महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली, जी मतदानाच्या स्वरूपात स्पष्टपणे दिसून आली. ग्रामीण भागातील महिलांनी ही योजना ‘त्यांच्या घरात आलेला मोठा बदल’ म्हणून स्वीकारली.

फक्त नवीनच नव्हे, तर जुन्या योजनांनीही या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली. 2006 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री बालिका सायकल योजना’ आणि शालेय गणवेश योजना यामुळे राज्यात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले. शिक्षण, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठी सातत्याने काम केल्यामुळे नितीश कुमार यांची प्रतिमा ‘महिलांसाठी काम करणारा नेता’ म्हणून दृढ झाली आहे.

यामुळेच यंदाच्या निवडणुकीत प्रचंड प्रमाणात सक्रिय झालेला महिला वर्ग NDA च्या विजयाचा मुख्य आधार ठरला. राजकारणाचा संपूर्ण पाटा महिलांनी आपल्या निर्णायक मतांद्वारे पलटवला असून आगामी काळातही महिला मतदारांचे महत्त्व अधिकच वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


Protected Content

Play sound